जीवनांना सक्षम बनवणे: कनिका तालुकदार यांचा गांडूळ खत निर्मितीतील शोकांतिकेतून विजयापर्यंतचा प्रवास Empowering Lives Kanika Talukdar’s Journey from Tragedy to Triumph in Vermicomposting
आसाममधील कनिका तालुकदार ही आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी नाव ठरली आहे. फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या २७ व्या वर्षी पतीचे निधन झाल्यानंतर चार महिन्यांच्या लेकराला घेऊन जीवन कसं पुढे न्यायचं याचा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला होता.२००८ मध्ये, जेव्हा कनिकाने मलेरियामुळे आपल्या पतीला गमावले, तेव्हा तिचे जग उद्ध्वस्त झाले. तिच्यावर आपल्या चार महिन्यांच्या मुलीला एकटीने वाढवण्याची जबाबदारी आली. आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्याच्या कठीण आव्हानाचा सामना करताना, तिने निराशेला बळी पडण्यास नकार दिला आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला.
हाताशी काहीच आधार नसताना, २०१४ मध्ये ती महिलांच्या स्वयंसहायता गटात सहभागी झाली आणि नलबारी जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राने घेतलेल्या गांडूळखत तयार करण्याच्या प्रशिक्षणाला गेली. तेच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं.
प्रशिक्षण संपल्यानंतर फक्त आठवड्याभरातच कनिकाने अवघ्या ५०० रुपयांची गुंतवणूक केली. घराजवळ सहज मिळणाऱ्या बांबूपासून तिने बेड तयार केले, गायीचं शेण आणि घरगुती जैविक कचरा यात टाकला आणि कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेली १ किलो गांडुळे वापरून पहिली पायरी घेतली. या प्रयत्नातून तिने ८ क्विंटल म्हणजेच ८०० किलो गांडूळखत तयार केले. हे खत तिने १ किलो आणि ५ किलो पॅकेट्समध्ये बाजारात विकले आणि पहिल्याच वर्षी तिला ८ हजार रुपयांचा नफा मिळाला.
हळूहळू या छोट्याशा प्रयत्नाने मोठा व्यवसाय आकार घेतला. २०१५ मध्ये तिची मासिक कमाई १ लाखावर गेली. २०१७ मध्ये ती वाढून १.७ लाख झाली आणि २०२३ पर्यंत ती ३.५ लाखांपर्यंत पोहोचली. आज कनिकाकडे अवघ्या दीड बीघा म्हणजे अर्ध्या एकराहून कमी जागा असूनही ती महिन्याला तब्बल ९० टन गांडूळखत तयार करते. यावरून तिला दरमहा ७ लाख रुपयांहून अधिक उलाढाल मिळते.
पूर्वी बांबूपासून तयार केलेले बेड आता तिने सिमेंटच्या टाक्यांमध्ये आणि प्लास्टिकच्या पोर्टेबल बेड्समध्ये बदलले आहेत. यामुळे खर्चही कमी झाला आणि उत्पादनक्षमता देखील वाढली. एवढंच नाही तर, तिने कृषी उद्योजकता प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा ब्रँड सुरू केला – “जय व्हर्मी कम्पोस्ट”. या नावामुळे तिच्या उत्पादनाला विश्वासार्हता मिळाली आणि बाजारपेठही वाढली. तिने गांडूळखताबरोबरच ‘व्हर्मीवॉश’ तयार करायला सुरुवात केली, जे द्रवरूप सेंद्रिय खत असून तेही शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.
आज कनिकाचे गांडूळखत आणि व्हर्मीवॉश फक्त स्थानिक बाजारातच नव्हे तर शासकीय नर्सरी, संस्था आणि मोठ्या प्रमाणात घाऊक खरेदी करणाऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. आसामबरोबरच नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्येही तिची उत्पादने मागणीला आहेत. सध्या ती १० लोकांना रोजगार देते आणि गावागावातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
अवघ्या ५०० रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेली ही यात्रा आज लाखोंच्या उलाढालीत बदलली आहे. आयुष्यातील संकटांना तोंड देत स्वतःचा व्यवसाय उभारणारी कनिका तालुकदार आज लाखो महिलांसाठी धैर्य, मेहनत आणि चिकाटीचं प्रतीक बनली आहे.